कोरोनाच्या व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या स्थिती काहीशी सुधारत असून मृतांचा आकडाही कमी झाला आहे. यादरम्यान आधार कार्ड (Aadhaar card) किंवा आयुष्मान कार्ड नसणं रुग्णांसाठी समस्या ठरत आहे. अशात यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) देशातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. UIDAI ने, केवळ आधार कार्ड नसल्याने कोणत्याही नागरिकाला उपचार नाकारता येणार नाही. तसंच लसीकरणासाठीही (Corona Vaccination) आधार कार्ड अनिवार्य नसल्याचे, स्पष्ट केले आहे.
UIDAI ने स्पष्ट केले आहे, की कोरोना वॅक्सिन घेण्यासाठी, औषधं घेण्यासाठी, तसंच रुग्णालयात भरती होण्यासाठी आधार कार्ड असण्याची अनिवार्यता संपवण्यात आली आहे. त्यामुळे इलाज करण्यासाठी, उपचार घेण्यासाठी केवळ आधार कार्ड नाही, म्हणून कोणीही नकार देऊ शकत नाही. आवश्यक सेवा मिळवण्यासाठी आता आधार अनिवार्य असणार नाही.
आधार कार्ड नसल्याने अनेकांना रुग्णालयात भरती करुन घेण्यासाठी नकार दिला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मेडिकल इमरजेंसी केसेसमध्ये अनेकांकडे आधार कार्ड तर असतं, पण घाईगडबडीत ते आणण्यासाठी विसरतात. त्यामुळे कार्ड नसणं ही बाब रुग्णांसाठी भारी पडते.UIDAI ने आता उपचारासाठी आणि लसीकरणासाठी आधार कार्ड सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.