मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. असे असताना देखील शाळांकडून पूर्ण फी आकारले जात आहे. यावर पालकांनी आक्षेप घेतला होता. याबाबत काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शुल्कात कपात करण्याबाबत घोषणा केली होती. पण अनेक शाळांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेत पालकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आता शालेय शिक्षण शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याचा शासकीय आदेश काढला आहे.
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी १५ टक्के शुल्क माफीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. पण खासगी शाळांमधील शुल्क नियमनामध्ये हस्तक्षेप झाल्यास सरकारचा निर्णय कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता होती. त्यावर अखेर सरकारने आदेश काढून तोडगा काढला आहे. राज्य सरकारने आता शालेय शिक्षण शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारने पत्रक जारी करत आदेश दिले आहेत.
फी कपातीबाबत कोणत्याही प्रकारची अडचण आली तर पालकांनी तक्रार निवारण समितीकडे तक्रार करावी, असे शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे.